
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वनौषधी ज्ञानाचा वापर करून स्वावलंबी बनावे : प्रा. डॉ. दत्ता ढाले
प्रताप महाविद्यालयाच्या “हर्बल कॉस्मेटिक्स व हर्बल मेडिसिनमधील उद्योजकता व स्टार्टअप्स” कार्यशाळा
अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी पारंपरिक वनौषधी ज्ञानाचा वापर करून स्वावलंबी बनावे, असे आवाहन कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून धुळे येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. दत्ता ढाले यांनी केले. त्यांनी “ग्रीन स्टार्टप्स : इंट्रेप्रेनेरशिप इन हर्बल कॉस्मेटिक्स अँड हर्बल मेडिसिन ” या विषयावर मार्गदर्शन करताना हर्बल उत्पादनांमध्ये उपलब्ध उद्योजकीय संधी, बाजारपेठेतील मागणी, गुणवत्ता नियंत्रण, परवाना प्रक्रिया व ब्रँडिंग याविषयी सविस्तर माहिती दिली.
अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागात राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान (रुसा ) अंतर्गत “इंट्रेप्रेनेरशिप अँड स्टार्टप्स इन हर्बल कॉस्मेटिक्स अँड हर्बल मेडिसिन” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेची सुरुवात श्रीमंत प्रताप शेठजी व पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. द्वितीय सत्रात “प्रेपरेशन ऑफ हर्बल कॉस्मेटिक्स अँड हर्बल मेडिसिन ” या विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विविध हर्बल उत्पादने तयार करण्याच्या पद्धती, आवश्यक कच्चामाल, प्रक्रिया व सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काही स्टार्टअप्सद्वारे तयार करण्यात आलेल्या हर्बल उत्पादनांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले, ज्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे वळून आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला हातभार लावावा, असे प्रतिपादन केले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष सी.ए. श्री. नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, सचिव प्रा. पराग पाटील, प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव, आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, कुलसचिव राकेश निळे, लेखापाल देवेंद्र कांबळे, मुख्य लिपिक भटू चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रा. जयेश साळवे, प्रा. हर्षाली चौधरी, प्रा. ज्योती पडूळ, प्रा. हर्षदा शिंदे, प्रा. प्रगती पाटील, प्रा. कल्याण लोहार, संदीप बिऱ्हाडे, प्रा. रविंद्र मराठे तसेच मानव सरदार, रेहान मुजावर, कुश धनगर व साहिल बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे हर्बल क्षेत्रातील व्यवसाय संधींबाबत व्यावहारिक ज्ञान मिळाल्याचे सांगितले. विभागप्रमुख प्रा. जयेश साळवे यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता व संशोधनवृत्ती विकसित होण्यास मोठी मदत होते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. पी. पडूळ यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. कल्याण लोहार यांनी मानले.

Leave a Reply