
झाडी शिवारातून पाच गुरांची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील झाडी शिवारातील शेतातून पाच गुरे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर सतीश पाटील (वय २८, रा. झाडी, ता. अमळनेर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीची गुरे झाडी शिवारातील गट क्रमांक ३२१/४ मधील शेतात बांधलेली होती. २४ जून २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी गुरांना चारा-पाणी करून घरी परतले होते. मात्र २५ जून रोजी सकाळी ६ वाजता शेतात आल्यानंतर दोन गायी, एक बैल आणि दोन वासरे बांधलेल्या ठिकाणी आढळून आली नाहीत. फिर्यादी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी व मित्रांनी परिसरात शोध घेतला; मात्र गुरांचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी ही गुरे चोरी करून नेल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. चोरीस गेलेल्या गुरांमध्ये एक राखाडी रंगाचा बैल, एक लाल-तपकिरी रंगाची गाय, एक पांढऱ्या रंगाची गाय, एक काळ्या रंगाचे वासरू आणि एक लाल-तपकिरी रंगाचे वासरू यांचा समावेश असून त्यांची एकूण अंदाजित किंमत ३१ हजार रुपये आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. संजय सूर्यवंशी करीत आहेत.

Leave a Reply