
बहादरपूर नाका परिसरात गाडीला कट मारल्याच्या कारणावरून तिघांना बेदम मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी )शहरातील बहादरपूर नाका परिसरात किरकोळ कारणातून वाद विकोपाला जाऊन तिघांना लोखंडी रॉड, लाकडी दांडा व चाकूने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय बाविस्कर यांचा मुलगा दि. ३ मे रोजी पायी दिंडीत फिरत असताना पैलाड भागातील दीपक हिरा भोई याने गाडीचा कट मारल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद शांत केला होता.
मात्र रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास फिर्यादी संजय बाविस्कर, त्यांचा भाऊ योगेश रतीलाल बाविस्कर व मुलगा हे घरी जेवण करत असताना मुलाच्या मोबाईलवर रविंद्र कैलास कोळी याचा फोन आला. त्याने तिघांनाही बहादरपूर नाका परिसरात बोलावून घेतले. तेथे गेल्यानंतर पूर्वी झालेल्या कट मारण्याच्या वादावरून पुन्हा बाचाबाची झाली.
वाद वाढताच निलेश भोई, विकी भोई, रविंद्र कोळी व दीपक भोई या चौघांनी एकत्र येत फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला चढविला. आरोपींनी लोखंडी रॉड, लाकडी दांडा तसेच चाकूचा वापर करून हातावर व डोक्यावर वार केल्याने तिघे जखमी झाले.
या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.

Leave a Reply