धार–मालपूर रस्ता काँक्रिटीकरणाला सुरुवात; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत धार ते मालपूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला. आमदार निधीतून मंजूर झालेल्या २५ लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या या कामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाल्याने धार व मालपूर परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे नागरिक व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आता दूर होणार असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी बोलताना आमदार अनिल दादा पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा मजबूत करणे हे आमचे प्राधान्य आहे. रस्ते, पाणी आणि वीज या सुविधा सक्षम केल्याशिवाय खऱ्या अर्थाने विकास साध्य होत नाही. धार–मालपूर रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना वर्षभर सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी नमूद केले. समारंभास धार व मालपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. ग्रामस्थांच्या वतीने आमदार पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले. गावाच्या विकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असून भविष्यातही अशा विकासकामांना प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सदर रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतीमाल वाहतूक सुलभ होणार असून शिक्षण, आरोग्य व दैनंदिन व्यवहारांसाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिणामी, धार व मालपूर परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *