
तापी नदीत पाणी उपलब्ध झाल्याने अमळनेरचा पाणीप्रश्न तात्पुरता मार्गी
अमळनेर (प्रतिनिधी) जळोद–कलाली पाणीपुरवठ्याचा जलस्तर कमी झाल्याने शहरात पाणीटंचाईची चिंता निर्माण झाली होती. मात्र तापी नदीत पाणी उपलब्ध झाल्याने पुढील काही दिवसांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.
अनोरेदे परिसरात अवैध बंधारा आणि रस्ता उभारल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळित झाला होता. याची माहिती मिळताच नगराध्यक्षांनी उपाध्यक्ष प्रशांत निकम यांना तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि संबंधित प्रशासनाशी संपर्क करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तातडीने कारवाई करून अवैध बंधारा आणि रस्ता हटवण्यात आला व पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू करण्यात आला. दुपारी उपाध्यक्ष, सभापती आणि नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तापी नदीच्या जळोद पात्रात पाणी साठवण्यासाठी तात्पुरता बंधारा उभारण्याच्या सूचनाही नगराध्यक्षांनी दिल्या. सध्या मे महिन्यात प्रथमच जळोद येथील दोन्ही पंप पूर्ण क्षमतेने सुरू असून कलाली डोह सुरू करण्यात आलेला नसल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या नियोजनामुळे नगरपरिषदेला आवर्तनासाठी खर्च होणारे सुमारे ४५ ते ५० लाख रुपये वाचल्याचे पाणीपुरवठा सभापती कैलासतात्या पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply