
लग्नसमारंभासाठी अमळनेरला आलेले वृद्ध बेपत्ता; पोलिसांत हरवल्याची नोंद
अमळनेर (प्रतिनिधी) शहादा तालुक्यातील मंदाने येथील रहिवासी काळू तानका बोरसे (वय ७५) हे अमळनेर शहरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काळू तानका बोरसे हे दि. १० मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मंदाने येथून गावातील काही नागरिकांसोबत अमळनेर शहरातील अंबिका मंगल कार्यालय येथे आयोजित लग्नसमारंभासाठी आले होते. दिवसभर ते लग्नकार्याच्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र सायंकाळी गावातील लोक परत गावी गेले असता काळू बोरसे त्यांच्यासोबत परतले नाहीत. गावकऱ्यांकडे चौकशी केली असता, “ते दुपारपर्यंत लग्नसमारंभात होते, त्यानंतर कुठे गेले याची माहिती नाही,” असे सांगण्यात आले. दरम्यान, अमळनेर येथील एका नातेवाईकांच्या घरी त्यांनी भेट दिली होती. मात्र “लग्नाला जायचे आहे,” असे सांगून ते तेथून निघून गेले होते. त्यानंतर अमळनेर शहरासह परिसरातील विविध नातेवाईकांकडे आणि ओळखीच्या ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांचे पुत्र उमेश काळू बोरसे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेत हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीसांकडून पुढील तपास सुरू असून नागरिकांना संबंधित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास अमळनेर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply