
महिलांनी रूढी, परंपरा जतन ठेवल्या हे अभिमानास्पद : संस्कृती रक्षणात महिलांची भूमिका अग्रस्थानी आमदार अनिल पाटील
अहिराणी संस्कृतीच्या जतनासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे

अमळनेर (प्रतिनिधी) खान्देशातील आखाजी महोत्सव हा अहिराणी संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण असून, गौराई, झोक्यावरची गाणी, जात्यावरील गाणी अशा पारंपरिक रूढी-परंपरांचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज आहे. हा महोत्सव शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, यासाठी सांस्कृतिक मंत्री व शासनाकडे निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी केले.
खान्देश साहित्य संघातर्फे अमळनेर येथील एल.आय.सी. कॉलनीत आयोजित आखाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी होते.
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी महिलांनी आजही परंपरा जपून ठेवल्या ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही अहिराणी भाषेत फटकेबाजी करत उपस्थितांचे मनोरंजन केले. स्वागताध्यक्ष कृउबा सभापती अशोक आधार पाटील यांनी स्वागतपर भाषण केले. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य संघाचे सचिव रमेश बोरसे, खजिनदार प्राचार्या रत्नाताई पाटील, ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, कवी हिरामण कंखरे, साहित्यिक गोकुळ बागुल, शाहीर नाना पाटील, भाऊसाहेब देशमुख, जयवंतराव पाटील, डॉ. अनिल शिंदे, दिनेश नाईक, एल.टी. पाटील आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या आयोजनासाठी सभापती अशोक पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, ॲड. व्ही. आर. पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, म.वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, बाजार समिती संचालक सचिन पाटील, अमेय मुंदडा, रिता बाविस्कर, राजू फपोरेकर, नगरसेवक सचिन पाटील, ज्ञानेश्वर धनगर, जयेशकुमार काटे यांनी योगदान दिले. आखाजी महोत्सवाच्या माध्यमातून खान्देशी लोककला, गाणी, रूढी- परंपरांचे दर्शन घडविण्यासाठी तसेच महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रत्येक विजेत्याला गौराई, प्रमाणपत्र, प्रथम ५ हजार ,द्वितीय ३ हजार , तृतीय २ हजार रोख बक्षीस देण्यात आले.
परीक्षक म्हणून वसुंधरा लांडगे, प्रा. शीला पाटील, लीना पाटील, सुरेखा बाविस्कर, दर्शना पवार, बोरकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शरद धनगर यांनी केले, तर सूत्रसंचालन सानेगुरुजी शिक्षक साहित्य संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील व पूनम बेडसे यांनी केले. तर आभार उमेश काटे यांनी मानले.
स्पर्धांमध्ये रंगली परंपरेची झलक
महोत्सवात पारंपरिक रूढी-परंपरांवर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पुरणपोळी स्पर्धेत प्रतिभा चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर नयना पाटील व मंगल सोनवणे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. झोक्यावरच्या गाण्यांच्या स्पर्धेत मेघना पवार व दीपिका पाटील जोडी प्रथम, रेखा भागवत व पूजा अधिकार द्वितीय, तर कविता पाटील व योगिता पांडे तृतीय ठरल्या.
उखाणे व वेशभूषा स्पर्धेत विजयाताई पाटील प्रथम, पल्लवी पुरुषोत्तम पाटील द्वितीय, तर राजश्री मनोहर नेरकर तृतीय ठरल्या. आरास स्पर्धेत जिजाऊ ग्रुप प्रथम, स्वामी समर्थ ग्रुप द्वितीय, तर धनदायी मंडळ तृतीय आले. घट्यावरच्या गाण्यांमध्ये रंजना महाजन यांनी प्रथम क्रमांक मिळवला. चित्रकला स्पर्धेत आशा दुसाने व लता दुसाने यांनी द्वितीय, तर श्यामल पाटील व कल्पना देवरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.एकूणच, पारंपरिक संस्कृतीचे जतन व संवर्धन करत आखाजी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Reply