
निर्दयीपणे आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या सहा जणांना अटक, १३ गुरांची केली सुटका
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा येथे शिरपूरहून चोपडा मार्गे जामनेरकडे गुरांची निर्दयीपणे आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून १३ गुरांची सुटका करून व सहा वाहने ताब्यात घेतली आहे. त्यांनी एकूण १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सावखेडा गावाजवळ गुरांची वाहनांमध्ये निर्दयीपणे बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे गोरक्षकांना आढळून आले. त्यांनी या वाहनांना अडवून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना कळवले. निकम यांनी घटनेची खात्री करून योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, सुनील जाधव, योगेश बागुल व सुनील पाटील यांच्या पथकाला पाठवले. पोलिसांनी खात्री केली असता सहा वाहनांमध्ये गुरांना दाटीवाटीने निर्दयीपणे कोंबलेले होते आणि त्यांच्याजवळ गुरांची वाहतूक करण्याचा परवाना देखील नव्हता. पोलिसांनी मालवाहू पिकअप वाहन (क्रमांक एम एच १८ बी जी ९३३२) हिच्यावरील चालक ज्ञानेश्वर रामचंद्र गोपाळ (वय २६, रा. सुळे ता. शिरपूर) , वाहन (क्रमांक एम एच ४१ , ए यु ८०५) हिच्यावरील चालक तुषार प्रभुलाल गोपाळ (वय २९, रा. हाडाखेड ता शिरपूर) , वाहन (क्रमांक एमएच ३९, सी ९९३७) वरील चालक विठ्ठल उत्तम गोपाळ (वय ३४, रा. दहिवद ता शिरपूर) , वाहन (क्रमांक एमएच ३०, एबी ३९३१) वरील चालक किशोर मांगीलाल गोपाळ (रा. दहिवद, ता. शिरपूर), वाहन क्रमांक (एमएच १८, बीझेड १६४६) हिच्यावरील चालक अमोल आनंदा खैरनार (वय ४० रा. बौद्धवाडा शिरपूर), वाहन (क्रमांक एमएच ३९, एडी १८०९) वरील चालक अकबर शेख, मुबारक शेख (वय रा. हुडको शिरपूर) यांना अटक करून त्यांच्या वाहनातील १ लाख ३० हजार रुपयांची गुरे आणि ११ लाख रुपये किमतीची सर्व सहा वाहने जप्त केली.
पोलिसांनी सर्व सहा आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणारा कायदा कलम ११(१)ड ,११(१)ई , ११(१) फ ,११(१) क , सह कलम ३(५) , मुंबई पोलीस कायदा १२४ यु प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत. जप्त केलेली गुरे पालन पोषणासाठी गोशाळेत रवाना करण्यात आली आहेत.

Leave a Reply