
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमळनेरात एनएसयूआयचा भव्य कँडल मार्च
अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनागोंदीचा निषेध, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण तसेच पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयूआय), अमळनेर यांच्या वतीने भव्य कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणाऱ्या अन्यायाविरोधात एकजूट दर्शविण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, पालक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिक या मार्चमध्ये सहभागी झाले.
हा कँडल मार्च बळीराजा स्मारक येथून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप झाला. हातात मेणबत्त्या घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी घोषणाबाजी करत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठविला.
यावेळी उपस्थितांनी हा कँडल मार्च केवळ निषेधापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि न्याय्य, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त शिक्षण व्यवस्थेच्या उभारणीसाठी दिलेला बुलंद आवाज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला. या कँडल मार्चमध्ये माजी आमदार बी. एस. पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील, धनगर दला पाटील, गोकुळ बोरसे, सुलोचना वाघ, दिनेश पवार, मगन भाऊसाहेब पाटील, कैलास पाटील, गिरीश पाटील, रज्जाक शेख, सईद तेली, मनोहर निकम, अशोक पवार, लीलाधर पाटील, प्रताप पाटील, रोहिदास दाजी पाटील, जयेश पाटील, नरेंद्र चव्हाण, सृजन संदानशिव, उमेश संदानशिव, प्रवीण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच न्याय मिळावा, यासाठी उपस्थितांनी मौन पाळून आदरांजली वाहिली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेला हा संघर्ष न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील, असा निर्धार यावेळी एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply