
ढेकूतांड्यात ‘हँड्स टू हील’तर्फे मोफत आरोग्य शिबिर; दोनशे रुग्णांना लाभ
अमळनेर (प्रतिनिधी) अमेरिकेत स्थापन झालेल्या सेवाभावी ‘हँड्स टू हील’ संस्थेतर्फे अमळनेर तालुक्यातील ढेकूतांडा येथे रविवारी, दि. ५ जुलै २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर उत्साहात पार पडले. अमेरिकेत सुरू झालेल्या या संस्थेचा भारतातील पहिलाच आरोग्य शिबिराचा उपक्रम आपल्या मायदेशात आयोजित करण्यात आल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शिबिरात सुमारे दोनशे नागरिकांनी आरोग्य तपासणी व औषधोपचाराचा लाभ घेतला.
या सेवाभावी संस्थेची संकल्पना अर्णव निकम व त्याच्या मित्रपरिवाराची असून, संस्थेचा पहिला उपक्रम भारतात आणि तोही आपल्या मातृभूमीत आयोजित करण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार ढेकूतांडा येथे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
शिबिराचे उद्घाटन निवृत्त पोलिस उपअधीक्षक अरविंद अमृतराव पाटील यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून करण्यात आले. भारतातील संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. किरण अमृतराव पाटील यांनी शिबिराचे संपूर्ण नियोजन केले.
शिबिरात डॉ. जयेश शिंदे, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. प्रियंका शिंदे, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. शरद बाविस्कर, डॉ. नरेंद्र महाजन, डॉ. दिनेश पाटील, डॉ. निखिल पाटील तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ उदयकुमार खैरनार यांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले.
उपक्रमासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, डॉ. संजय रनाळकर, डॉ. केतन पाटील, डॉ. मराठे, आशागट प्रवर्तक शितल, कोमल, भूषण चौधरी, भारती पाटील, शितल पाटील, माया पाटील, अंगणवाडी सेविका तसेच स्वयंसेवक जयेश पाटील, मानसी मराठे, अपूर्वा पाटील, प्रणित मराठे, प्रतिमा मराठे आणि दीपा पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.शिबिरात गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक औषधोपचार तसेच पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. आवश्यक रुग्णांना पुढील संदर्भ सेवा व पाठपुरावा करण्याचे आश्वासनही डॉक्टरांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. किरण अमृतराव पाटील यांनी केले. यावेळी हभप नीलकंठ पाटील आणि डॉ. जयेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून अशा सेवाभावी उपक्रमांची ग्रामीण भागाला मोठी गरज असल्याचे सांगितले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दुधे, भिला पाटील, महारु पाटील, मधु पाटील, किरण जाधव, सुभाष पवार, गोविंद बारेला, मोहन राठोड, संदीप पवार, राजेंद्र पवार तसेच ढेकूतांडा येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
विशेष म्हणजे, अर्णव निकम हा अमळनेर येथील प्रा. डॉ. बी. एस. पाटील आणि भारती पाटील (कमा अक्का) यांचा नातू असून, त्यांच्या प्रेरणेतून या सेवाभावी संस्थेचा भारतातील पहिला उपक्रम यशस्वीपणे साकार झाला.

Leave a Reply