
कोळपिंप्रीची डिजिटल अंगणवाडी जिल्ह्यासाठी ठरली आदर्श; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पाठपुराव्याचे कौतुक
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळपिंप्री येथे माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उभारण्यात आलेली अत्याधुनिक व डिजिटल सुविधांनी सुसज्ज अंगणवाडी आज जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून उभारण्यात आलेल्या या अंगणवाडीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष भेट देत प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
या भेटीदरम्यान उपस्थित सर्व अधिकारी व मान्यवरांनी अंगणवाडीच्या दर्जेदार बांधकामासह आधुनिक सुविधांचे कौतुक करत हा उपक्रम जिल्ह्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. पाहणी दौऱ्यात रणधीर सोमवंशी (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद), संदीप सोनावणे (कनिष्ठ अभियंता), वैशाली जडे (शाखा अभियंता), कदम (गटविकास अधिकारी), चौधरी (जिल्हा परिषद मुख्याध्यापक), सुनील पाटील (प्राथमिक शिक्षक), राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील काटे, विस्ताराधिकारी रावसाहेब चिंचोरे, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, कोळपिंप्रीचे सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सुविधांची पाहणी
अधिकाऱ्यांनी अंगणवाडीतील प्रशस्त वर्गखोली, आकर्षक शैक्षणिक भित्तीचित्रे, डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक साहित्य, बालमैत्रीपूर्ण वातावरण, सुरक्षित परिसर, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र स्वच्छतागृह, खेळणी, अध्ययन साहित्य तसेच पोषण व आरोग्यविषयक सुविधांची सविस्तर पाहणी करून समाधान व्यक्त केले. अंगणवाडी ही केवळ बालसंगोपनाची जागा नसून बालकांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक विकासाचा भक्कम पाया घालणारे केंद्र आहे. अशा दर्जेदार व आधुनिक अंगणवाड्या उभारल्यास ग्रामीण भागातील बालशिक्षणाची गुणवत्ता निश्चितच उंचावेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आमदारांच्या कार्याचे विशेष कौतुक
उपस्थित अधिकाऱ्यांनी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या विकासाभिमुख दृष्टीकोनाचे विशेष कौतुक केले. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून कोळपिंप्रीसारख्या ग्रामीण भागात अत्याधुनिक डिजिटल अंगणवाडी मंजूर करून गावकऱ्यांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात अशा प्रकारची डिजिटल अंगणवाडी उभारणे ही उल्लेखनीय बाब असून हा प्रकल्प इतर ग्रामपंचायतींसाठीही आदर्श ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अंगणवाडी योजनेचे महत्त्व
महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमधून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार, पूर्वप्राथमिक शिक्षण, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, वाढ नोंदणी तसेच गर्भवती व स्तनदा मातांना पोषण व आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार बालपणीच्या शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कोळपिंप्री येथील ही डिजिटल अंगणवाडी बालकांसाठी आनंददायी शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देत ग्रामीण विकासाचा नवा आदर्श ठरत असून, गावकऱ्यांनीही आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले.

Leave a Reply