
दहिवदचा आदर्श! अहिल्यादेवी होळकर जयंतीत कर्तबगार महिलांचा सन्मान
सामाजिक सलोखा, सर्व महापुरुषांना समान अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) : दहिवद येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक एकात्मतेचा अनोखा संदेश देत दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. गावाने जपलेल्या सामाजिक सलोख्याच्या परंपरेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमात सुनिता अशोक धनगर व मनीषा आनंद सोनवणे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत महिलांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला डी. ए. धनगर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत प्रशासक पाटील साहेब, ग्रामविकास अधिकारी शेखर न्हाळदे, माजी जि.प. सदस्य ए. टी. पाटील, माजी पंचायत समिती सभापती सुभाष देसले, दिनेश पाटील, प्रवीण माळी, शिवाजी पारधी आदींची उपस्थिती होती.
सर्व महापुरुषांना समान अभिवादन
जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जिवाजी महाले, समशेरसिंग पारधी व वीर एकलव्य यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. एका महापुरुषापुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता सर्वांना समान आदर देण्याची परंपरा विशेष ठरली.
बंधुभावाचा संदेश
महापुरुषांचे विचार हे समाजाला दिशा देणारे असून त्यांच्या एकत्रित सन्मानातून जातीय भेद कमी होऊन सामाजिक एकात्मता वाढते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक धनगर, रमेश धनगर, गुलाब धनगर, रामकृष्ण धनगर, खंडू ढिवरे, किरण ढिवरे, ज्ञानेश्वर बोरसे, रावसाहेब धनगर, सुनील धनगर आदींसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सलोख्याचा आदर्श ठरला दहिवद
महिलांचा सन्मान, सामाजिक ऐक्य आणि सर्व महापुरुषांप्रती आदर व्यक्त करणारा हा उपक्रम दहिवद गावाच्या सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण ठरला.

Leave a Reply