
“मातंग-भिल्लांना मुरूम टाकून देणार नाही”; जातीवाचक शिविगाळ करत तिघांना मारहाण
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नागरिकांना जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केल्याची घटना २९ मे रोजी दुपारी ३ वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेखा अरुण वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तळवाडे गावातील शेतशिवारात पाईपलाईनचे काम सुरू होते. त्या ठिकाणी निघालेला मुरूम शिवाजी लोटन पाटील हा ट्रॅक्टरद्वारे दुसरीकडे टाकत होता. त्यावेळी फिर्यादीचे पती अरुण वाघ, दिर प्रवीण वाघ, संजय वाघ, लालचंद भिल व यशोदाबाई भिल यांनी “इकडे-तिकडे टाकण्यापेक्षा नवनाथ बल्ल्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाका” असे सांगितले. याचा राग आल्याने शिवाजी पाटील याने “तुम्हा मातंग व भिल्लांना मुरूम टाकून देणार नाही, इथे बल्ल्यावर राहू देणार नाही, ट्रॅक्टरखाली चिरडून टाकू,” अशी धमकी देत जातीवाचक शिविगाळ केली. त्यानंतर त्याने फोन करून लोटन मोतीराम पाटील व उमेश लोटन पाटील यांना बोलावून घेतले. तिघांनी मिळून शिविगाळ करत अरुण वाघ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रेखा वाघ यांचा हात शिवाजी पाटील याने ओढल्याने त्यांच्या हातातील बांगडी फुटून त्या जखमी झाल्या. तसेच यशोदाबाई भिल या महिलेलाही तिघांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसांत शिवाजी लोटन पाटील, लोटन मोतीराम पाटील व उमेश लोटन पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५, ३५१(२), ३५२, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(आर)(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते करीत आहेत.

Leave a Reply