
कालिदास दिनानिमित्त १५ जुलै रोजी मेघदूत महाकाव्यावर विशेष व्याख्यान
अमळनेर (प्रतिनिधी) : संस्कृत साहित्याचे महान कवी महाकवी कालिदास यांच्या साहित्यसंपदेचे स्मरण आणि संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने संस्कृत भारती, अमळनेर आणि ज्ञानराज प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता ‘कालिदास दिन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अमळनेर येथील टिळक मंदिर (जुना टाऊन हॉल) येथे होणार आहे.
या कार्यक्रमात कालिदास अष्टकाचे सादरीकरण, कालिदास यांच्या साहित्याचा परिचय, पावसाळी कवितांचे वाचन तसेच त्यांच्या अजरामर ‘मेघदूत’ महाकाव्याचा परिचय या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमात डॉ. रा. कन्याशाळेतील विद्यार्थिनी, संस्कृत शिक्षिका तसेच संस्कृत विषयाचे विद्यार्थी विविध सांस्कृतिक व शैक्षणिक सादरीकरण करणार आहेत. या प्रसंगी जळगाव येथील संजय पिलेसर हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहून ‘मेघदूत महाकाव्याचा परिचय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रा. कन्याशाळा, अमळनेरच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी राहणार आहेत.
ज्ञानराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रा. डॉ. एस. लोहार, सुधीर टाकणे, प्रज्ञा परेश जोशी, देवयानी भावसार तसेच संस्कृत भारती परिवाराचे विशेष सहकार्य लाभले आहे. संस्कृत भाषा, साहित्य आणि भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास संस्कृतप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply