
शेताला आग लावल्याच्या संशयातून चौघांकडून मारहाण; सळईने हल्ला
अमळनेर (प्रतिनिधी) शेतात आग लावल्याचा संशय घेऊन चौघांनी एका व्यक्तीस चापट-बुक्क्यांनी तसेच सळईने मारहाण केल्याची घटना दि. १५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बोदर्डे शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखव करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शांतीलाल काशिनाथ संदानशीव (रा. वाघाडी, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांची अमळनेर तालुक्यात कलंबू रस्त्यावर शेती आहे. दि. १५ रोजी ते आपल्या शेतात साफसफाईसाठी काटेरी झुडपे काढून कचरा जाळत होते. त्याचवेळी जवळच असलेल्या योगराज राजेश संदानशिव यांच्या शेतात सुमारे १०० मीटर अंतरावर शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग विझविण्यासाठी शांतीलाल तेथे गेले. आग आटोक्यात आणण्यात आली; मात्र तोपर्यंत अंदाजे २ ते ३ गुंठे पिकांचे नुकसान झाले. ही आग शांतीलाल यांनीच लावल्याचा संशय घेत त्यांचा भाऊ पवन यास योगराज, त्याचा मुलगा, संतोष गुलाब चौधरी व बापू साहेबराव बडगुजर यांनी चापट-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच योगराज यांच्या मुलाने सळईने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी शांतीलाल संदानशीव यांनी मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १९१(२), १९१(३), १८९ (२), ११८, ११५, ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रवीण पारधी करीत आहेत.

Leave a Reply