अमळनेरात १७ जून रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव उत्साहात

विद्यार्थी गुणगौरव, व्याख्यान व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम; समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव सालाबादप्रमाणे यंदाही १७ जून रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. राजपूत एकता मंच अमळनेर शहर व ग्रामीण यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून व्याख्यान, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम बुधवार, दि. १७ जून, ज्येष्ठ शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी सायंकाळी ७ वाजता अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात  होणार आहे. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी “महाराणा प्रताप : हल्दीघाटी युद्धाची साडेचारशे वर्षे व भारत” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून प्राचार्य डॉ. संजीव गिरासे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी खासदार स्मिता उदय वाघ राहणार आहेत. तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि त्यागाचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे यासाठी गुणगौरव सोहळ्याचाही समावेश करण्यात आला आहे. राजपूत एकता मंच अमळनेर शहर व ग्रामीण यांच्या वतीने सर्व समाजबांधव तसेच हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८६ व्या जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *