
अमळनेरात संत साहित्याचा जागर; संत कबीरांच्या विचारांची केली प्रभावी मांडणी
अमळनेर (प्रतिनिधी) संत विचारांचे आधुनिक संदर्भात पुनरावलोकन करत समाजात विवेक, समता आणि सत्याची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित संत साहित्य जागर उपक्रमाला अमळनेरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पू. साने गुरुजी वाचनालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात संत कबीरांच्या विचारांचा सखोल वेध घेण्यात आला.
या वेळी प्रा. डॉ. मनोज महाजन (एम. जे. कॉलेज, जळगाव) यांनी संत कबीर हे ज्ञान, विवेक आणि निर्गुण भक्तीचे प्रणेते होते, असे प्रतिपादन केले. त्यांनी समाजात केवळ तत्त्वज्ञान मांडले नाही, तर ते तळागाळापर्यंत रुजवण्याचा प्रयत्न केला. कबीरांची भक्ती निर्गुण, निराकार आणि सर्वसमावेशक होती. त्यांनी कोणत्याही एका धर्माचा प्रचार न करता धर्मांमध्ये पूल उभारण्याचे कार्य केले, असे त्यांनी सांगितले.
डॉ. महाजन यांनी कबीरांच्या जीवनकार्याचा, साहित्याचा आणि त्यांच्या दोह्यांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. कबीरांनी सत्य मांडताना राजसत्तेचा व समाजाचा विरोध पत्करला, तरीही ते न डगमगता सामान्य माणसाच्या वेदना मांडत राहिले. समाजाला अंधश्रद्धेपेक्षा निरीक्षण व प्रश्न विचारण्याची ताकद देणे हे त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीऐवजी एकतारी भजनी मंडळाने संत कबीरांचे दोहे सादर करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप घोरपडे होते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे आणि साहित्यिक प्रा. बी. एन. चौधरी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी संत विचार समाजात डोळसपणे रुजवण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. ग्रामीण व शहरी भागातील रसिकांचा मोठा सहभाग हा या उपक्रमाच्या यशाचा पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला मसापचे सदस्य, पत्रकार, वाचनालयाचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते. महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. मसापच्या या संत साहित्य जागर उपक्रमाची ही सलग सहावी मैफल ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमेश माने यांनी केले, तर परिचय व आभार प्रदर्शन डॉ. विजया गायकवाड यांनी केले.

Leave a Reply